नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातल्या नोकरदारांना एक आनंदाची बातमी आहे. एऑन या मानव संसाधन क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपनीने एका अहवालातून यंदाच्या पगारवाढीबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. भारतातल्या नोकरदारांना यंदाच 9.1 चक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आशिया पॅसिफिक पट्ट्यात येणाऱ्या इतर कोणत्याही देशातल्या नोकरदारांच्या तुलनेत ही पगारवाढ सर्वाधिक असणार आहे. आशिया पॅसिफिक पट्ट्याचा विचार केला तर भारतीयांना मिळणारे वेतनवाढ सर्वाधिक असणार आहे. सध्या देशात मंदि असल्याची परिस्थीती असली तरी देखील भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला प्राधान्य देऊन पगारवाढ देणार आहे. असे एऑन अहवालात नमूद केले आहे. गेल्या वर्षी भारतीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सरासरी 9.3 टक्के इतकी पगारवाढ दिली होती.
मात्र यंदा भारतातल्या 39 टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के वेतनवाढ देऊ शकतात, असा एऑनचा अंदाज आहे. तर 42 टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना पगार 9ते 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. 20 पेक्षा जास्त क्षेत्रातल्या 1 हजाराहून अधिक कंपन्यांकडून मिळालेल्या आकडेवारीचा आधार घेऊन एऑनने अहवाल तयार केला आहे. ई-कॉमर्स आणि व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्या यंदा 10 टक्के किंवा त्याहून अधिक पगारवाढ देऊ शकतात. औषध उत्पादक कंपन्या यंदा सर्वाधिक वेतवाढ देण्याची शक्यता आहे. याशिवाय एफएमसीजी आणि केमिकल कंपन्यादेखील पगारात चांगली वाढ देऊ शकतात.
एऑनच्या झीटेल फर्नांडिस यांनी सांगितले की, ‘2019 मध्ये भारतातल्या कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र तरीही भारतीय कंपन्या पगारवाढीबद्दल सकारात्मक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच आशिया पॅसिफिक पट्ट्यात वेतनवाढीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल.’ आशिया पॅसिफिक पट्ट्यात येणाऱ्या देशांचा विचार केल्यास पगारवाढीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. त्यानंतर चीनचा (6.3 टक्के) क्रमांक असेल. यानंतर फिलिपिन्स (5.8 टक्के), सिंगापूर(3.8 टक्के), ऑस्ट्रेलिया(3.1 टक्के) यांचा क्रमांक असेल.