नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने बुधवारी एक महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. 109 मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने सुरु केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक 151 रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्यात याव्यात असा रेल्वेचा प्लॅन आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, यातून भारतीय रेल्वेला 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेद्वारे प्रथमच रेल्वे गाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्यात येत आहे. रेल्वेमध्ये गेल्याच वर्षी खासगीकरणाचा शिरकाव झाला आहे. गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने RCTC च्या माध्यमातून लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही अलिशान प्रवासी गाडी सुरु केली आहे.
रेल्वेने प्रसिद्ध केलल्या पत्रकात म्हटले आहे की, रोजगार निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने खासगी क्षेत्राला रेल्वेने आमंत्रित केलं आहे. प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवास देण्याबरोबर यातून रोजगार निर्मिती देखील होणार आहे.
अशा असतील गाड्या
अत्याधुनिक 150 रेल्वेगाड्या यासाठी वापरण्यात येतील. यात बहुतेक गाड्यांची निर्मिती भारतात झालेली आहे. प्रत्येक गाडीला किमान 16 डबे असतील. ताशी 160 किमी वेगाने धावणाऱ्या या गाड्या असतील. त्या त्या रुटवरच्या सर्वात वेगवान गाडीच्या तुलनेतच या खासगी गाड्यांचा वेग अधिक असेल. या गाड्यांच्या निर्मितीपासून, देखभाल आदी सेवा पूर्णपणे मेक इन इंडिया अर्थात भारतीय बनावटीच्या असतील.