नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ८ वाजता देशाला संबोधित करणार असून याच्या अगदी अगोदर रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सगळ्या कॅटेगरीच्या रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतीला संपवले आहे. विद्यार्थी, दिव्यांगांच्या ४ कॅटेगरी आणि ११ प्रकारच्या रुग्णांना मिळणारी सवलत कायम असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय कोविड-१९ मुळे घेतला असून ही सवलत पुढच्या सूचनेपर्यंत दिली जाणार नाहीये. रेल्वेने हा निर्णय घेतला आहे जेणेकरून कमीत कमी संख्येने लोकं प्रवास करतील आणि कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण कमी होईल. या अगोदर रेल्वेने देशात एकूण २५० रेल्वे स्टेशनवर मिळणारे प्लॅटफॉर्म तिकीट १० रु.ने वाढवत ५० रु. केले होते.
अनुदान चालू राहील
रेल्वेने सगळ्या अधिकाऱ्यांना यासंबंधी नोटीस देत म्हटले आहे की, रेल्वे तिकिटावर मिळणारे अनुदान चालू राहणार आहे. या निर्णयामध्ये फक्त सवलत रद्द केली असून वर्तमानात ५३ कॅटेगरीमध्ये सवलत मिळते, ज्यापैकी केवळ १५ कॅटेगरीमध्ये ही सवलत कायम राहणार आहे. याशिवाय बाकी ३८ कॅटेगरीसाठी मिळणारी सवलत काही काळासाठी थांबवली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूवर देण्यात आलेल्या आरोग्य सल्लागाराच्या दृष्टीने लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा निर्णय २० मार्च २०२० आणि त्यापुढील बुक केलेल्या तिकिटांवर लागू होईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेकडून पुढील सूचना येईपर्यंत हा निर्णय कायम राहील.