नवी दिल्ली: वृत्तसंस्था- पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात ५७ सदस्यांना स्थान मिळाले. मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांच्या वाट्याला कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं आली आहेत. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. तर, राज्यमंत्रिपदी खासदार रावसाहेब दानवे, रामदास आठवले व संजय धोत्रे यांची वर्णी लागली आहे.
यंदा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडं मागील सरकारमधील अवजड उद्योग खातं कायम ठेवण्यात आलंय. याआधी हे खातं अनंत गीते यांच्याकडं होतं. आता ते शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडं देण्यात आलं आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना सामाजिक न्याय मंत्री पद देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा हे पद मिळाले आहे त्यांची पहिल्यांदाच मंत्रीपदी वर्णी लागली आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, माहिती व तंत्रज्ञान या खात्याची राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
# कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं
१)नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
२)प्रकाश जावडेकर- माहिती आणि प्रसारण, पर्यावरण
३)पीयूष गोयल -रेल्वे मंत्री
४)अरविंद सावंत -अवजड उद्योग
# राज्यमंत्रिपद
१)रावसाहेब दानवे -ग्राहक संरक्षण,अन्न व नागरी पुरवठा
२)रामदास आठवले -सामाजिक न्याय
३)संजय धोत्रे -मनुष्यबळ विकास, माहिती व तंत्रज्ञान