नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताकडे जगातील सर्वात मोठे आणि उंचावरील युद्धांसाठी प्रशिक्षण देण्यात आलेले अनुभवी सैन्य आहे. अशा उंच ठिकाणी लढाई लढताना आवश्यक असणारे गिर्यारोहणाचे कौशल्य प्रत्येक भारतीय सैनिकाकडे आहे, असे मत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी (पीएलए) उपकरणे तयार करणार्या कंपनीच्या अधिकार्याने आणि चीनशी संबंधित लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पठार आणि पर्वतरांगा असा दोन्ही ठिकाणी लढाई करु शकणारा सध्या जगातील सर्वात मोठा आणि अनुभवी सैन्य हे अमेरिका, रशिया किंवा कोणत्याही युरोपियन देशांकडून नसून ते भारताकडे आहे, असे गुओझी यांनी लेखात म्हटले आहे. लष्करी आणि संरक्षणासंदर्भातील माहिती देणारे ‘मॉडर्न वेपनरी’ हे एक महत्वाचे मासिक मानले जाते. विशेष म्हणजे हे मासिक चीन सरकारच्या मालकिच्या चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडशी संबंधित आहे. पीएलएसाठी यंत्रे, डिजिटलाइज्ड आणि स्मार्ट उपकरणे विकासित करण्याची मुख्य जबाबदारी एनओआरआयएनसीओकडे आहे. ही कंपनी ही जगातील सर्वात मोठ्या संरक्षण कंत्राटदारांपैकी एक आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगच्या यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाशी संबंधित कामांमध्येही या कंपनीचा मोठा सहभाग आहे.
त्यामुळे अशा कंपनीच्या मालकीच्या मासिकाच्या संपादकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक होणे विशेष मानले जात आहे. भारत आणि चीनमध्ये लडाखच्या सीमेरेषेजवळ मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा लेख छापण्यात आला आहे. सामान्यपणे कडवा राष्ट्रवाद आणि आपल्याकडील तंत्रज्ञान तसेच लष्काचे कौतुक करण्याची परंपरा असणार्या चीनी प्रसारमाध्यमांमध्ये अशाप्रकारे भारताचे कौतुक क्वचितच पहायला मिळतं. त्यामुळेच हा लेख अनेक अर्थांना विशेष असून यामधून भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसून येत आहे.