मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. देशभरातील अनेक गावात लस उपलब्ध केली गेली आहे. याचबरोबर आता तरुणांनाही लस दिली जावी अशी मागणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नुकतच मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्ष पुढील व्यक्तींना कोरोना लस दिली जावी अशी मागणी केली होती. तर यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस मिळणार असल्याची घोषणा केली. यानंतर आता तरुणांनाही लस देण्याची मागणी होत आहे.
जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतेय. त्यामुळे 18 ते 35 वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी ही नम्र विनंती. @OfficeofUT
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 5, 2021
यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी ही नम्र विनंती, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. तसेच, जीव धोक्यात घालून फिरणाऱ्या पत्रकारांनाही लस द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली असून ती मान्यही करण्यात आली आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्राने लसीकरण गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता तरुणांनाही लस देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असेही त्यांनी फोनवरून मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.