नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने पहिल्यांदा मान्य केले आहे की, मागील वर्षी गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात त्यांचे चार सैनिक मारले गेले होते. यापूर्वी चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबत मौन बाळगले होते. पूर्व लडाखच्या गलवान खोर्यात मगील वर्षी मे महिन्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते तर चीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेले होते. पण असे म्हटले जात आहे की, चीन अजूनही मरण पावलेल्या सैनिकांची खरी संख्या लपवत आहे.
माहितीनुसार, चीनने पहिल्यांदा मान्य केले आहे की, गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात त्यांचे 4 सैनिक मारले गेले होते. चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमीशनने शुक्रवारी त्यांना फर्स्ट क्लास मेरिट सायटेशन आणि मानद पदवीने सन्मानित केले आहे. चेन होंगजुन यांना नायक ही मानद पदवी दिली आहे तर अन्य तीन सैनिक चेन जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन यांना फर्स्ट क्लास मेरिट सायटेशन दिले गेले आहे. जवानांचे नेतृत्व करणारा एक कर्नल क्यूई फेबाओ जो हल्ल्यात गंभीर जखमी झाला त्यांना ‘नायक कर्नल‘च्या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
रशियन न्यूज एजन्सी तास ने दावा केला आहे की, मागील वर्षी भारत-चीन लष्करातील वाद कमी करण्याच्या प्रयत्नादरम्यान पूर्व लडाखच्या गलवानमध्ये दोन्ही लष्करांमध्ये झालेल्या खूनी संघर्षात चीनचे सुमारे 45 सैनिक मारले गेले होते. तर, भारतीय लष्कराच्या एका कर्नलसह 20 जवान शहीद झाले होते. मात्र, या संघर्षात किती जवान मरण पावले याबाबतची माहिती चीनने कधीही अधिकृत प्रकारे दिली नाही.