बहुजननामा ऑनलाईन टीम : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना उलटला तरी अद्याप राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तरी सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापनेचा प्रयत्न करीत आहे, मात्र राजकीय पक्षातील नेत्यांच्या विविध वक्तव्यांमुळे कोणताही अंदाज बांधणे आहे.
पंतप्रधानांकडून राष्ट्रवादीचे कौतुक :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पीएम नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे भरभरून कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले, ‘आज मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेडी या दोन पक्षांचे कौतुक करावेसे वाटते. या दोन्ही पक्षांनी काटेकोरपणे संसदीय नियमांचे पालन केले आहे. त्यांनी आपला मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला. यातून बरेच काही शिकता येते. कारण महाराष्ट्रात १०५ जागा असूनही भाजप सरकार बनवू शकत नाही आणि राष्ट्रवादी तेथे किंगमेकर म्हणून उदयास आली आहे.
रामदास आठवले यांचा सरकार स्थापनेसाठीचा नवा फॉर्मुला :
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी नवा फॉर्मुला मांडला आहे. आठवले म्हणाले, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मी त्यांना ३-२ फॉर्म्युला सुचविला असून, ज्यात दोन वर्षे शिवसेना आणि ३ वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असेल, भाजपला हा फॉर्म्युला मान्य असेल तर शिवसेना त्यावर विचार करेल, असे राऊतांनी सांगितली आहे, त्यामुळे मी यावर भाजपशीही बोलणार आहे. आठवलेंच्या विधानानंतर भाजप शिवसेनेच्या अटीपुढे वाकेल की नाही, यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यामुळे शिवसेना नाराज ? :
सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थितीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच सरकार स्थापनेसाठी दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. पवारांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
शरद पवार म्हणाले, ‘कोणाबरोबर जायचे यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. आम्हाला आमच्या मित्र पक्षांशीही बोलावे लागेल. शिवसेनेचे किती आमदार आहेत हे मला माहिती नाही. त्यांना विचारा, आम्ही सर्वांसह आहोत. केवळ आम्ही आमच्या पक्षाचे धोरण ठरवू. कोणाबरोबर जायचे हे फक्त आम्हीच ठरवू.पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत राष्ट्रवादीचे कौतुक केले यावर शरद पवार म्हणाले, ‘सभागृहाची प्रतिष्ठा बाळगणे महत्वाचे आहे. हे आमचे धोरण आहे. आम्ही फक्त भाजपविरूद्ध निवडणूक लढविली असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com