बहुजननामा ऑनलाईन टीम – कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील दुकाने आणि आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही वाढ दुप्पट प्रमाणात असणार आहे. तर गेल्या ९ वर्षा पासून ही वाढ प्रलंबित होती. राज्यातील सुमारे एक कोटी कामगारांना या वेतन वाढीचा फायदा होणार आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र तसेच महानगरपालिका क्षेत्रापासून २० कि. मी. पर्यंतचे औद्योगिक क्षेत्र आणि छावणी क्षेत्रातील परिमंडळात काम करणाऱ्या कुशल कामगारांना ५,८०० वरून ११,६३२, अर्धकुशल कामगारांना ५,४०० वरून १०,८५६, अकुशल कामगारांना ५,००० वरून १०,०२१, तर नगरपरिषद परिमंडळातील कुशल कामगारांना ५,५०० वरून ११,०३६ अर्धकुशल कामगारांना ५, १०० वरून १०,२६०, अकुशल कामगारांना ४,७०० वरून ९,४२५ अशा या दोन परिमंडळ वगळून महाराष्ट्र राज्याच्या उर्वरित क्षेत्रात कुशल कामगारांना ५, २०० वरून १०, ४४०, अर्धकुशल कामगारांना ४,८०० वरून ९,६६४, अकुशल कामगारांना ४,४०० वरून ८,८२८ एवढी पुनर्निधारीत करण्यात आलेली आहे. २४ जुलै २०१९ पासून या संदर्भातील अधिसूचना लागू करण्यात आली आहे.
११ नोव्हेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र कामगार किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून रघुनाथ कुशीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार मंडळांच्या सल्ल्याने वरील किमान वेतनवाढ होणार आहे. ६७ रोजगारांमधील कामगारांसाठी किमान वेतनवाढ पुनर्निधारित करण्याचे काम प्रस्तावित आहे.