बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनाला विधानसभा अध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मोठे विधान करत सूचक संकेत दिले आहेत.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाबाबत आधीच निर्णय झालेला आहे. हे पद काँग्रेस कडेच राहणार आहे. त्याबाबत कोणताही बदल करायचा असेल तर तीन नेते शरद पवार-सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे घेतील, असे अजित पवार यांनी सांगितले.
हडपसर येथे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव घेतले जात आहे. या प्रकरणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, मुंबईमध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले. त्या तक्रार कर्त्या महिलेने तक्रार मागे घेतली. तरीही आरोप सुरुच आहेत. तिच्या मागे कोणी बोलवता धनी होता का हे ही तपासले पाहीजे. पुण्यातल्या प्रकाराचा तपास सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी वीजबिलाच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, वीजबील संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे. त्यावर व्याज आहे. त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.