नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – सध्या राज्य पोलीस दलात एका वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच नागरिक त्यांच्यावर विश्वास करतील, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांचा हा कटाक्ष राज्य पोलिस दलातील भ्रष्टाचाराचे आरोप जडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने होता. दरम्यान राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्रीपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचेही ते म्हणाले.
गृहमंत्री वळसे- पाटील गृहमंत्रीपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथमच नागपूरात आले होते. त्यानंतर गडचिरोलीत घडलेल्या चकमकीचे वृत्त समजताच ते गडचिरोलीत गेले होते. त्याठिकाणाहून सायंकाळी परतल्यानंतर त्यांनी नागपुरात पोलीस अधिका-यांची बैठक घेत नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्याच्या संबंधाने लागलेले आरोप- प्रत्यारोप आणि घडणाऱ्या घडामोडी या संबंधाने गृहमंत्री वळसे-पाटील फारसे बोलले नाही. मात्र कोरोनामुळे राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे.
अशात आपल्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी येणे म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. अभ्यास आणि नियोजन करून आपण पोलीस विभागासाठी काही नवीन उपाय योजना अंमलात आणणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान 2009 मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते. गडचिरोली पोलिसांनी केलेली आजची ही कारवाई बदला नव्हे, तर एक योगायोग आहे. नक्षवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या आजच्या कारवाईबद्दल गृहमंत्र्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले आहे.