बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या कोरोनाची साथ चालू असून दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या लोकांची संख्या वाढत असून अवैधरित्या खर्रा व सुगंधित तंबाखू विक्री जोमात (Illegal sale of tobacco)सुरु असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील आयुध निर्माणीच्या चेक पोस्टसमोर, जुन्या सोनल टाॅकीजसमोर, कुंभार बोडीजवळील चौक,नागमंदिर चौक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्रा आणि सुगंधित तंबाखुची सर्रास विक्री चालू आहे. खर्रा शौकीन हे पानठेल्यावर खर्रा खातात व तेथेच आजुबाजुचा विचार न करता पचपच थुंकतात. कोरोना हा आजार संसर्गजन्य असून थुंकीद्वारे पसरु शकतो.त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. परंतू प्रशासनाच्या या नियमाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास पानठेल्यावर खर्रा विकत घेणा-यांची मोठी गर्दी होत असल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडतो.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील नवीन बसस्थानकाच्या परिसरात बसेस थांबतात त्याठिकाणी खर्रा खाऊन थुंकण्याचा किळसवाना प्रकार नेहमीच पहायला मिळतो.परंतू या बसस्थानकातील अधिका-यांना त्याचे काहीच वाटत नाही.
भद्रावतीचा खर्रा जवळपासच्या परिसरात प्रसिद्ध असल्याने इतर गावातही येथील ख-र्याला जोरदार मागणी आहे.त्यामुळेच बाहेरुन मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू भद्रावतीत येतो व तो छुप्या मार्गाने विकला जातो. अव्वाच्या सव्वा किंमतीने तंबाखू विकल्या जात असल्याने ख-र्याचे भावही चांगलेच वधारले आहे.खर्रा खाणा-यांमध्ये पुरुष मंडळी,मजुरी करणा-या स्त्रिया,अल्पवयिन मुले-मुली,म्हातारी मंडळी यांचा समावेश आहे. खर्रा पुरवठा करण्यासाठी खर्रा व्यावसायिकांनी खर्रा घोटण्यासाठी अल्पवयीन मुलांना अल्पवेतनावर कामाला ठेवले असून त्यातून बालकामगारांची समस्या निर्माण झाली आहे.याबाबतीत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी दि.५ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे चंद्रपूर जिल्हा सह आयुक्त यांना निवेदन सादर केले असून त्याच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आ.सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, अन्न व प्रशासन विभागाचे नागपूर विभाग आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार व ठाणेदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.