मुंबई बहुजननामा : पीक विम्यासाठी काढलेला मोर्चा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर मतांच्या राजकारणासाठी आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढून दाखवा, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला दिले आहे. एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभुल करत असल्याची टिका केली आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न हा मंत्रीमंडळाच्या बैठकीत सोडवला जावू शकतो, मात्र तो सोडवण्याची सरकारची इच्छा नसल्याने शिवसेना मोर्चाकाढून जबाबदारी झटकत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी शिवसेनेने मोर्चा काढण्याआधी देखील टिका केली होती. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री सहभागी होत असतात. मंत्रीमंडळात ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत मात्र बाहेर येऊन आंदोलनाची भाषा करतात.
सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षाने जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन अंमलबजावणी करुन घ्यायची असते. मात्र सरकरामध्ये शिवसेनेचे काहीच चालत नसल्याने त्यांना विरोधी पक्षासारखे आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे म्हणता हा मोर्चा म्हणजे शिवसेनेची नौटंकी असल्याची टिका वडेट्टीवार यांनी केली होती. शिवसेनेला कोणीही गांभीर्याने घेत नाही. सरकारच्या आशीर्वादानेच मागील पाच वर्षात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची पिळवणुक करुन कंगाल केले. मागील पाच वर्षापासून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लुट होत असताना शिवसेना काय करत होती, असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.