नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची साथ सोडून गेलेल्यांवर निशाणा साधत चांगल्या डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो. पण, त्यांचा सल्ला मानला नाही तर घोटाळा होतो, असे म्हणाले आहेत. नवी मुंबईत रिटेल केमिस्ट आणि होलसेलर्स असोसिएशनतर्फे सुरु करण्यात आलेल्या केमिस्ट ब्लड बँकेचे उद्घाटन होते. त्याचे उद्घाटन सानपाडा येथे शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यादरम्यान पवार बोलत होते. तसेच या उद्घाटनाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे, महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे हेही उपस्थित होते. पवार यांनी संघटनेचे कौतुक करत यामुळे गरजू आणि गरीब नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच केमिस्ट असोसिएशनही संकटकाळात मदतीला धावून येणारी सेवाभावी संघटना आहे, असेही ते म्हणाले. ऑनलाईन औषधविक्री सुविधा देताना कोणत्या औषधांना परवानगी देण्यासाठी नियम होण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत लवकरच चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे छगन भुजबळ यांनीही भाषण केले. त्यांनी खूप बोलायचे आहे. पण भाजपच्या आमदार मंद म्हात्रे येथे उपस्थित आहेत, त्यामुळे बोलत नाही. पण त्या आपल्याच आहेत, असे ते म्हणाले.
पुढे विश्वास राजेंद्र शिंगणे हेही बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात वर्षाला १३ लाख रक्ताच्या बाटल्यांची गरज असून वेगवेगळ्या ब्लड बँकेच्या माध्यमातून सध्या ११ लाख बाटल्या रक्त जमा होते. केमिस्ट ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्ताची गरज काही प्रमाणात पूर्ण होईल. दरम्यान ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, माजी आमदार मिलिंद कांबळे, माथाडी नेते शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही उद्घाटनासाठी उपस्थित होते.