मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. राजकीय पक्ष आपापल्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. परंतु भाजप-शिवसेनेची युती अद्याप झालेली नाही. युती होणार की नाही ही गोष्ट अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु युती न झाल्यास नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे अशी चर्चा आहे.
नारायण राणे आणि छगन भुजबळांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं कारण युतीच आहे. दोन्ही पक्षात स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. स्वबळावर लढण्यासाठी राणे आणि भुजबळांना राखून ठेवलं आहे असं समजत आहे. भाजपच्या काळात ज्या भुजबळांवर कारवाई झाली त्यांना शिवसेनेत घेतलं तर भाजपला पटणार नाही तसेच नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसेनेला पटणार नाही. म्हणूनच राणे-भुजबळ अस्त्र राखून ठेवलं आहे.
सर्व्हे रिपोर्ट सांगतो की, राणेंना घेऊन लढल्यास भाजप कोकणात किमान 4 जागा जिंकू शकतो. तसेच भुजबळांना सोबत घेतल्यास शिवसेनाही चार जागा जिंकू शकतो. त्यामुळे राणे-भुजबळ युतीत आल्यानंतर जरी तणाव निर्माण होण्याची शक्यता असली तरी मात्र युती झाली नाही तर राणे-भुजबळांना घेऊन दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यास तयार आहेत अशी माहिती समोर आली आहे.