बहुजननामा ऑनलाइन टीम – पुण्यातील काही भागात आयडिया वोडाफोन(Idea-Vodafone) ग्राहकांना आज सकाळपासून नेटवर्क नसल्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. कंपनीकडूनही(Idea-Vodafone) ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्यानं #vodafoneindia हा हॅशहॅग ट्रेंड करताना दिसत आहे.
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यातच सकाळपासून नेटवर्क गेल्यानं वोडाफोन-आयडीयाची नवीन कंपनी व्हीआयचं नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना अर्ध्या तासापूर्वी रेंज आली आहे. मात्र त्यात इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचं या ग्राहकांनी सांगितलं.
पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांना कंपनीनं काही तांत्रिक अडचण असल्याचं सांगत सर्व काही सुरळीत होईल असं सांगितलं आहे. आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाह पहावी लागली आहे.
पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई शेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील वोडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीये. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरू आहेत. याचबरोबर अमरावती येथील आयडिया ग्राहकांनादेखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे.
परीक्षार्थींची मोठी अडचण
सध्या राज्यभरातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू आहेत. तसंच शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. वोडाफोन नेटवर्क समस्येमुळं ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी वोडाफोन मिनी स्टोर समोर लोकांची गर्दी झाली आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.