बहुजननामा ऑनलाईन टीम – ‘राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्याची अशी बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र आद्यपही शिवसेना-भाजपने सरकार स्थापन केले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असतानाही त्यांची आपापसातील वाद संपण्याचे नाव घेत नाहीये. त्यांच्यामध्ये नेमके काय चालले आहे हेच समजेनासे झालेय, लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन सरकार स्थापन करावे, जेणेकरून राज्यातील प्रश्न मार्गी लागतील,’ असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. आज सायंकाळी सहावाजता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांनी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासंदर्भात राज्यपालांची भेट घेत काही मागण्या ठेवल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते.
सध्याच्या काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीची १० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. परंतु सरकारची ही मदत तोडकी असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीहेटक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, सरकार यामध्ये लक्ष घालण्याचे नाव घेत नाहीये, ते आपापल्या वादातच गुंग आहे, त्यामुळे यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच काही दिवसांपूर्वीच सांगली, कोल्हापूरमध्ये महाभंयकर पूर आला होता. सरकारने त्यावेळी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली होती. मात्र, अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. परतीच्या पावसाने राज्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये ज्वारी, तूर, कापूस, द्राक्ष या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, तसंच हवामान खात्याने दिलेल्या आश्रयामुळे समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांना देखील मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच ओला दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, केंद्राची मदत आली नाही, विम्याचे पैसे आले नाही अशी कारणे न देता, सेल्फ अॅडव्हानस काढून मदत करावी.
दरम्यान विनोद तावडे यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावर बोलताना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माझे तिकीट का कापले हे विचारण्यासाठी तावडे आले असतील असा टोला अजित पवार यांनी लगावला. तसेच ज्याला मत देण्याचा अधिकार नाही त्याने राज्यपालांची भेट घेण्याचे कारण काय. राज्यपालांची भेटच घ्यायची होती तर प्रमुख नेत्यांनी भेट घेतली पाहिजे,असे ही अजित पवार म्हणाले.