बहुजननामा ऑनलाईन टीम : शिवतीर्थावर गुरुवारी (२८ नोहेंबर) ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या इतर सहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ देखील सामील होते. शपथविधीनंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मला आज विश्वास बसत नाही. कारण मी जगेन असं मला वाटत नव्हतं, पण नियतीचा खेळ आहे. मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो आहे,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं. त्याचबरोबर माझ्यासोबत जे झाले ते मी कधीच विसरलो आहे. पण मी कोणासोबतही सुडबुद्धीचे राजकारण करणार नाही. माझ्यासोबत कोणी आकसाने वागले म्हणून मी तसा वागणार नाही,’ असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ‘राज ठाकरेसाहेब बोलत होते की, मला विरोधी पक्षासाठी मत द्या तर देवेंद्रे फडणवीस बोलत होते विरोधी पक्ष संपला आहे. आता आम्हाला विरोधक मिळाले आहे. आम्ही जिथे चूकणार तिकडे तुम्ही सांगायचे पण विरोधाला विरोध चालणार नाही.’ राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन शरद पवारांच्या आदेशानूसार शपथ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोहेंबर रोजी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. ‘मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी शपथ सुरु केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना शपथ दिली. ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
Visit : bahujannama.com