मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणता ना कोणता नेता गौप्यस्फोट करताना पहायला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील एक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेने 2014 मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शिवसेनेने अशा प्रकारचा प्रस्ताव दिला नसल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच याबाबत कल्पना नसल्याचे देखील म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेतील झालेल्या आघाडीबाबत बोलताना अशाच प्रकारचा प्रस्ताव पाच वर्षापूर्वी आला होता असे सांगितले होते. ते म्हणाले, त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकार स्थापन झाले होते. तर भाजपविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तीनही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर करावे असा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी फेटाळून लावला असल्याचे चव्हाण यांनी सांगिलले होते.
एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. अशा परिस्थितीमध्ये भाजपकडे परत सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणून मी पर्यायी सरकारची कल्पना मांडली. तसेच सेना-भाजपमध्ये मतभेद झाल्यानंतर ते प्रत्यक्षात यावेत यासाठी पुढाकार घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सुरुवातीला माझ्या कल्पनेला विरोध झाला. परंतु मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी चर्चा केली. अल्पसंख्यांक नेत्यांशी बोललो. भाजप आपला एक नंबरचा शत्रू आहे आणि राज्यात त्याला रोखणे गरजेचे असल्याचे सर्वांना पटवून दिल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com