मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशाच्या संविधानाने कुठलीही एक जात दुसऱ्या जातीला कैद करणार नाही अशी व्यवस्था केली आहे. म्हणून मी या संविधानाला खेकड्याची उपमा देतो. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. माळी समाज सत्ता संपादन प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. निवडणुका जवळ आल्या की, देशाला धोका असल्याचे चित्र निर्माण केले जाते असेही त्यांनी म्हटले आहे.
इतकेच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आरोप करत म्हटलं की, “पुन्हा आपल्या देशावर बाहेरून राज्य करायला आता कुणीच येणार नाही. त्याचे कारण म्हणजे देशावर राज्य करण्यासाठी देशाची आर्थिक नाडी हातात पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला बंदुकीची आणि जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
पुढे आंबेडकर म्हणाले की, “आता ही लढाई जातीय व्यवस्थेमधील लढाई आहे. एक जात दुसऱ्या जातीला कैद करत असल्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे. मात्र संविधानाने एक जात दुसऱ्या जातीकडून कैद होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. म्हणून मी या संविधानाला खेकड्याची उपमा देतो.” असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. या निवडणुकीत आघाडीत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.