बहुजननामा ऑनलाइन टीम – हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीचे पोलिसांनी केलेले एन्काऊंटर कायद्याला धरून नाही, हे एन्काऊंटर अयोग्य होते, झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. शेवटी ते दरोडेखोरच होते. असे परखड मत उज्वल निकम यांनी व्यक्त केले. तसेच हैदराबाद पोलिसांच्या कारवाईवर संशयही व्यक्त केला आहे. आरोपींच्या हातात बेड्या असतात, मग आरोपींनी पोलिसांचे शस्त्र घेतलेच कसे ? असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे. निकम यांच्यासह प्रकाश आंबेडकर आणि निलम गोऱ्हे यांनीही या एन्काऊंटर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
‘दिशा’ रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबत संशय व्यक्त केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही. कायद्याची प्रतिक्रिया ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याती प्रथा पोलिसांनी सुरू केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आले असते. या एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना असे एन्काऊंटर होते. त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सुत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. हैदराबाद पोलिसांच्या कारवाईनंतर सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक केलं जातंय.
Visit : bahujannama.com