सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर (Solapur) ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माणुसकी दर्शन घडवत सोलापूर (Solapur) अडकलेल्या 52 मजुरांना विेशेष बसने मध्यप्रदेशात पाठवले आहे. या घटनेची दखल घेऊन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तेजस्वी सातपुते यांचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे.
मध्य प्रदेशातील कटनी येथून सुमारे 900 किमी अंतरावरून रोजगारासाठी 52 मजूर व त्यांचे कुटुंबीय ऊसतोडणीच्या कामासाठी सोलापूरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ऊसतोडीचे काम सुरू केले होते. मात्र मजुरांना कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे ऊसतोड करणे जमत नव्हते. त्यामुळे ते येथेच अडकून पडले होते. काम करता येत नसल्यामुळे मजुरीची रक्कमही मिळणे बंद झाले होते. मजुरीची रक्कम मिळत नसल्याने उपासमार होऊ लागली. त्यामुळे वैतागलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशात परत पाठविण्याचा आग्रह धरत होते. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. मुकादमानेही या सर्व मजुरांना डांबून ठेवले होते.
संबधित मजुरांनी आपली अडचण मध्य प्रदेशातील कटनीच्या जिल्हाधिका-यांना कळविली. याची तातडीने दखल घेत कटनीच्या जिल्हाधिका-यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते यांनीही यासंदर्भात तेवढीच संवेदनशीलता दाखवत कंदलगाव येथे अडकलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची व्यवस्था केली.विशेष बसमधून सर्व मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेवर पाठविण्यात आले. त्यासाठी मुकादम तथा टोळी प्रमुख व ऊसतोड मजुरांमध्ये समन्वय घडवून प्रत्येक मजुराला दोन हजार रूपये मजुरीची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय प्रवासात जेवण, सोलापुरी चादर, टॉवेल तसेच, सॅनिटायझर, मुखपट्ट्या पुरविण्यात आल्या. मध्य प्रदेशाच्या सीमेवर तेथील प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी पार पाडली.
तक्रार नसल्याने कारवाई नाही
याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता विचारपूस करूनही संबंधित मजुरांनी कोणतीही तक्रार केली नाही. मूळ गावी परत जाणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे होते. तक्रारीअभावी पोलिसांना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता आली नसल्याचे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.