कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच पुलवामा हल्ला कसा होतो असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
ममता म्हणाल्या, गुप्तचर यंत्रणांकडून 8 फेब्रुवारीला निवडणुकांपूर्वी दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. मग यावर तत्काळ कार्यवाही का करण्यात आली नाही. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतरही सीआरपीएफच्या 78 वाहने एकत्र का पाठवण्यात आले, त्यांना एअरलिफ्ट का करण्यात आले नाही. यामध्ये असा किती पैसा खर्च होणार होता. ज्या लोकांनी हा हल्ला घडवून आणला त्यांच्यावर सरकारने कारवाई करायला हवी असेही त्या यावेळी म्हणाल्या.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच देशात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष राजकीय फायदा घेवू इच्छित आहे. तसेच यावरुन भाजपा-आरएसएसच्या लोकांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर देश त्यांना कधीही माफ करणार नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.
मला देखील गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे की, माझे फोन टॅप केले जात आहेत. याची तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर पुन्हा सडकून टीका केली.