मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्फोटकं भरलेली कार, या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याचाच संशय त्यातच माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटीची मागणी केल्याचा आरोप या सर्व घडामोडीमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकरणावरून भाजपने सरकारची कोंडी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसही अडचणीत सापडली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेटची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हजेरी लावली. मात्र देशमुख हे मागच्या दाराने बैठकीला पोहोचल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून त्यामध्ये ते असे म्हणाले की, खंडणीखोरिचा आरोप असलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?, जनतेला तोंड दाखवू न शकणारा गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अजूनही खुर्चीवर आहे, कारण वसुलीत सगळ्यांचा वाटा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप केला होता. संसदेतही परमबीर सिंग यांच्या पत्राचा मुद्दा गाजला. भाजच्या राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील मंत्र्यांनीदेखील पत्रकार परिषदा घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. मात्र आता कॅबिनेट संपल्यानंतर झालेल्या बैठकीत विरोधकांकडून होत असलेले आरोप खोडून काढण्याची गरज असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं समोर आल असून एकत्र येऊन लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे.
बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांकडून परमबीर सिंग यांच्या पत्राची ढाल करून महाविकास आघाडी सरकारवर हल्ले होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांचे आरोप खोडून त्यांना उघडं पाडायला हवं. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
मी निर्दोष – अनिल देशमुख
माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत, असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडतोय का? त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? अधिकारी फोन टॅप करणार असतील, तर मग मंत्र्यांनी कामं कशी करायची?, असे काही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.