मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी शहरात कोरोनाचा धोका जरी कमी झाला असला तरी राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अद्यापही वाढत आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. त्याबाबतची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्याच्या १५ जिल्ह्यांतील वाढत्या रुग्णसंख्येचा महसूलमंत्री @bb_thorat यांनी घेतला ई-आढावा. आरोग्यमंत्री @rajeshtope11, वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh उपस्थित. कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्नांची गरज- श्री. थोरात pic.twitter.com/P0jPIrabne
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 21, 2021
राज्यातील उपरोक्त 15 जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी (दि. 22) जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे बैठक घेतली. यात हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता धोका कमी करण्यासाठी होम आयसोलेशन बंद केेले जाणार असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरवले आहे. राज्यासाठी आवश्यक 3 हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी, यासाठी ठिकठिकाणी प्रकल्प उभारणीस परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.