औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘दी इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाई’ यांच्यातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य- इतिहास, साहित्य आणि सद्यकालीन परिस्थिती’ या विषयावर आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मौलाना आझाद संशोधन केंद्रात शनिवारी केले होते.
या चर्चासत्राचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले. यावेळी ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या पुस्तकाचे लेखक-समीक्षक प्रा. डॉ. आनंद पाटील, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे, प्रा. प्रदीप सोळुंके, प्रा. श्रीराम जाधव, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ.राम चव्हाण, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. महेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आनंद पाटील यांनी इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बीजभाषण केले.
आपल्या देशात इतिहास म्हणून भाकडकथा सांगितल्या जातात. इतर देशातील ज्ञान भाषांतरित होऊन आले नसल्यामुळे आपण कुठे आहोत याचे भान राहिले नाही. इतिहासात नेहमीच अज्ञानाचे उत्पादन केल्यामुळे सांस्कृतिक गळचेपी झाली. महाराष्ट्रात सत्य बोलणे म्हणजे न जगण्याची सोय करणे असे इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटले होते. त्याची प्रचीती आजही येते. सिद्धांत व संकल्पना ठाऊक नसल्यामुळे आजच्या काळाला जोडून भाकडकथा सांगतात. नव्या पिढीने व्यासंग वाढवून तटस्थ व मोलाचे इतिहास लेखन करावे, असे आवाहन डॉ. आनंद पाटील यांनी केले.
जो समाज इतिहासात रमतो त्याचे भविष्य अंधकारमय असते. इतिहासातून धडा घेऊन वर्तमानकाळ जिंकायचा असतो. मोठ्या समाजाला अंकित ठेवण्यासाठी इतिहासाची मोडतोड करतात, असे ग्रामचीने म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अतिरंजित सांगितला गेला. हिंदूविरुद्ध मुस्लिम वादासाठी इतिहास वापरला गेला. त्याला छेद देण्याचे काम वास्तववादी अभ्यासकांनी केले, असे प्रतिपादन श्रीमंत कोकाटे यांनी केले.
या चर्चासत्रात ११० संशोधकांनी सहभाग घेतला. डॉ.अनिस अब्दुल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हुसेन शेख, प्रा. कृष्णा आगे, प्रा. राजाराम जेवे, डॉ. अशोक हुंबे, डॉ. विष्णू पाटील आदींनी चर्चासत्रासाठी परिश्रम घेतले.