कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – वडार समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा केला आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी वडार समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे राज्य सरचिटणीस, इचलकरंजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी पत्रकार परिषदेत आभार मानले. पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष दत्ता माणगांवकर, शहराध्यक्ष युवराज शिंगाडे, अनिल गाडीवडर, दीपक शिंगाडे, युवराज पाथरवट आदी उपस्थित होते.
राज्यभर विखुरलेल्या वडार समाजाला एकत्रित करून त्यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक विकास समितीची स्थापना करून त्याच्या अध्यक्षपदी वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर येथील वडार समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती. ती खरी करून वडार समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास समितीची स्थापना करून शब्दाला जागण्याचे काम केले आहे. यामुळे वडार समाजातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळणे, विधवा व निराधार महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमातून स्वयंरोजगार मिळवून देणे, वृद्धांना पेन्शन देणे आदी कामे होणार आहेत. तसेच वडार व पारधी समाजातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे.