नागपूर बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत नागपूर मतदार संघातून निवडून आलेले खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांप्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अतुल चांदूरकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगालाही नोटीस बजावण्यात आली असून दोघांनाही २३ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकसभा निवडणूकीत दोषपुर्ण इव्हीएम वापरण्यात आले आहेत. त्यामुळे झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात तफावत आढळून आली आहे. त्याचा फायदा गडकरींना झाला. त्यासोबतच निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे गडकरी यांची निवड रद्द करून नागपूर मतदारसंघात पुन्हा मतदान घ्यावे अशी याचिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे तसेच मतदार मो. नफीस यांनी याचिका दाखल केली आहे.
यावेळी याचिकाकर्त्यांची बाजू अड. अभियान बाराहाते, अड. बरुणकुमार यांनी तर निवडणूक आयोगातर्फे अड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.