High Court News | आंतरधर्मीय विवाह कुटुंबाला मान्य झाला नाही, जावयाला हाकलून देऊन लेकीसह नातवाला दोन महिने ठेवलं डांबून, हायकोर्टाच्या आदेशाने सुटका

जालना: High Court News | पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी शहरालगतच्या आलापुर भागातून सुटका केली आहे. तिला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मार्फत तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल ही छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मिसाळवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला. यानंतर शहा कुटुंबीय आलापुर येथे परत आपल्या मूळ गावी आले. या विवाह संबंधातून शहनाजला तीन वर्षाचा कार्तिक नावाचा मुलगाही आहे.

अधिक माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी शहनाजच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ बघण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला आणि तिचा पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. ते या ठिकाणी आले असता शहनाज आणि तिचा मुलगा कार्तिक यांना तिच्या आई-वडिलांनी घरात ठेवून घेतले आणि पती सागर याला घरातून हाकलून दिले. यानंतर ७ डिसेंबर रोजी सागर पुन्हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुझा आणि आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात पुन्हा दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागर याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला हाकलून देण्यात आले.

मात्र, यानंतर २४ डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागर याला फोन करून सांगितले की शहनाज आणि तिच्या मुलाला तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने घरात डांबून ठेवले असून त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे सागर याने अखेर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन त्याच्या पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली.

उच्च न्यायालयाने शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यांची सुटका करावी असा आदेश भोकरदन पोलिसांना दिला. त्यानुसार, पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी. टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यानंतर ते आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरी गेले. मात्र, त्यांना शहनाजच्या आईने कोणताही थारा लागू दिला नाही. यानंतर त्यांनी गोपनीय माहिती मिळवून थेट घरामध्ये घुसून शहनाज व कार्तिक यांना ताब्यात घेतले.

यावेळी शहनाजच्या आईने भरपूर विरोध केला प्रसंगी पोलिसांवर चाल ही केली. मात्र, महिला कर्मचारी सीमा देठे व उपनिरीक्षक बी. टी. सहाने यांनी कुटुंबीयांच्या कठोर विरोधाला नजुमानता शहनाज व कार्तिक यांना भोकरदन पोलीस ठाण्यात आणले यावेळी शहनाजचे दोन्ही पाय मोठ्या साखळदंडाने बांधून त्यांना दोन कुलूप लावण्याचे आढळून आले.

पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी या कुलपांच्या बनावट किल्ल्या तयार करून ही कुलपे उघडली व शहनाजला मुक्त केले. यानंतर २९ जानेवारी रोजी उपनिरीक्षक बी. टी. सहाने यांनी शहनाज व कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. आर. काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हजर करून तिचे पती सागर ढगे यांच्या स्वाधीन केले.