मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी आणि अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्याविरोधातील आरोपांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह वाटत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा यांच्यावर अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये देशविरोधात कारवाई करणे यांसह अनेक गंभीर आरोपांचा समावेश होता. संबंधित फिर्याद रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी नवलखा यांच्या लॅपटॉपमधून अनेक आक्षेपार्ह मजकूर आणि पत्रं मिळाली आहेत. त्यातूनच त्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचं स्पष्ट होत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांच्यावतीने करण्यात आला आहे. ही कागदपत्र जेव्हा सीलबंद लिफाफ्यात कोर्टापुढे दाखल केली. मात्र या कागदपत्रांवरुन आणि पत्रांमधून काहीही आक्षेपार्ह असल्याचं स्पष्ट होत नाही, त्यामुळे नवलखा यांना ही कागदपत्रे बाळगण्यास हरकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
नवलखा यांनी नेहमीच शांततेसाठी काम केले आहे. तरीही पुणे पोलिसांनी त्यांच्यावर देशाविरोधात युद्ध पुकारण्यासारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने ही सुनावणी १८ जूनपर्यंत तहकूब केली असून तोपर्यंत नवलखा यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.