बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,’ या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक विशेष साहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाईल.
पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार या दर्जापर्यंतच्या अमंलदारांच्या वारसांना ही मदत मिळणार आहे. त्याचबरोबर दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे निधी दिला जाणार आहे. याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुख्यांना दिले आहे.
अनेक घटनेमध्ये पोलीस ‘ऑनड्युटी’मृत्यूमुखी पडतात. या मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून अनुदान, विम्याची रक्कम, पोलीस कल्याण निधीतून विविध स्वरुपात मृतांच्या वारसांना मदत दिली जाते. मात्र, अमंलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास यापूर्वी त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रकमेच्या स्वरुपात वाढ करण्याची मागणी गेली कित्येक वर्षापासून अमंलदार वर्गातून केली जात होती. ७ नोहेंबरला महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सहाय्यता निधीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला. त्यावेळी जायस्वाल यांनी अशाप्रकार मृत्यूमुखी पडणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत असतात. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याने, त्यांच्या वारसांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय शासन, विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत, वेल्फेअर कल्याण निधीतून दिले जाणारे सानुग्रह, अनुदानही निर्धारित मुदतीमध्ये द्यावी, अशा सूचनाही महासंचालकांनी पोलीस घटक प्रमुखांना केल्या आहे.
हा निधी मृत्यूमुखी अंमलगाराच्या कायदेशीर वारसाला मिळण्यासाठी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बॅंक खात्याबाबतचा सविस्तर तपशील, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावयाची आहे. त्यानंतर, हा निधी संबंधित वारसदारांना दिला जाणार आहे.
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल म्हणाले की, विविध घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. मात्र, नैसर्गिकपणे निधन झालेल्यांच्या वारसांना निर्धारित स्वरुपातशिवाय असा कोणताही लाभ मिळत नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी 50 हजार रुपये अनुदान दिल्याने बिकट प्रसंगी त्यांना थोडा-फार हातभार मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे.