बहुजननामा ऑनलाईन टीम
राज्यभरातील अधिकार्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्र्यांकडून फेटाळल्या गेलेल्या तक्रार अर्जावर राजभवनात सुनावण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांकडे पाठविण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला आहे. या आधी राजभवनात आलेले अर्ज किंवा अपील जसेच्या तसे पुन्हा त्याच मंत्र्यांकडे पाठविले जात होते. ही परंपरा खंडित करून, अपील अर्जावर सुनावण्या घेण्याचा निर्णय कोश्यारी यांनी घेतला आहे.
राज्यपालांनी वर्षपूर्तीनिमित्त राजभवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. साधरणत: शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सेवाविषयक तक्रारींचे निवारण कण्यासाठी मुख्यमंत्री वा मंत्री यांच्याकडे अर्ज करतात. बर्याचदा ते फेटाळले जातात, मग न्याय मागण्यासाठी ते राज्यपालांकडे अपील करतात. परंतु राज्यपाल पुन्हा ते अर्ज मुख्यमंत्री किंवा त्याच मंत्र्यांकडे पाठवितात. हा सगळा निरर्थक प्रकार आहे. मग राज्यपाल इथे कशाला बसले आहेत, असा सवाल कोश्यारी यांनी केला आहे. आता मंत्री, मुख्यमंत्री यांनी फेटाळलेल्या अपिलांवर राजभवनात सुनावणी घेण्याचे राज्यपालांनी ठरविले आहे. 4 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.