मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर राज्यातील लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु असतानाच अनेकजण लॉकडाऊनवरून विऱोध करत आहेत. यावरून आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे लॉकडाऊनबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, लोकांच्या बिनधास्तपणामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाला थांबवण्यासाठी आम्ही दुप्पट गतीने राज्यात लसीकरण करणार आहोत, असे टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या पाहता, याची चिंता राज्य शासनाला आहे. ही रुग्णसंख्या थांबवण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्य शासन करत आहे. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधनं कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे. तर ते कमी पडू दिले जात नाही. लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. मात्र आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो, अशी महत्वपूर्ण प्रतिक्रिया टोपे यांनी दिली आहे.
तसेच पुढे टोपे म्हणाले, सगळयांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येईल. कोरोनासाठी सध्या निधीची कोणतीही अडचण नाही. अनेकजण कोरोना बाधित स्वत:ची काळजी घेत नाहीत आणि इतरांनाही बाधित करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचे काहीही लक्षण दिसली तर त्वरित चाचणी करून, उपचार सुरु केले पाहिजेत. अधिकाधिक नागरिकांनी लस घेतली पाहिजे. सर्व सामाजिक आणि राजकीय संस्थांनी १ एप्रिलपासून ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्याचे निवडणुकीप्रमाणे लसीकरण केलं पाहिजे. यामुळे रोग प्रतिकारशक्ती तयार होईल, असेही टोपे यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असे या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे.