बेळगाव वृत्तसंस्था : निशांत मनोहर कदम याने अडीच किलोमीटर पुराच्या पाण्यात पोहून राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. निशांत हा बेळगाव मधील मन्नूर येथील रहिवासी आहे.
निशांत हा मन्नूर येथील ज्योती महाविद्यालयात बारावीला आहे. या स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक राज्याच्या संघात निवड झाली होती. बंगरुळु मध्ये ७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मुसळधार पावसामुळे तेथील मार्कंडेय नदीला पूर आला. त्यामुळे आसपासच्या इतर शहरांशी संपर्क तुटला. त्यामुळे स्पर्धेला कसे जायचे ? हा प्रश्न उभा राहिला . परंतु ह्या स्पर्धेत मी सहभागी होणारच ! याच्या या जिद्दीला त्याच्या वडिलांनी देखील साथ दिली.
निशांत च्या वडिलांनी म्हणजेच मनोहर कदम यांनी त्याचे सर्व साहित्य प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळले आणि पुराच्या पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला . या दोघा बाप – लेकानी सुमारे अडीच किलोमीटर पुराच्या पाण्यात पोहत ४५ मिनिटात बेळगाव गाठले . त्यानंतर बेळगाव वरून रेल्वे ने बंगरूळू ला गेले आणि स्पर्धेत सहभाग घेतला . एवढेच नाही तर त्याच्या या मेहनतीचे फळ देखील त्याला मिळाले. त्याने या स्पर्धेत रौप्य पदक देखील पटकावले. निशांत अर्जुन पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक मुकुंद किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुष्टियुद्धाचा सराव करत आहे.