इंदापूर: Harshvardhan Patil On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे (Dattatrya Bharne) यांच्यासह प्रमुख सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करीत असतानाही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना इंदापूरातून मोठे लीड मिळाले. याबाबत हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर येथील पत्रकार परिषदेत खंत व्यक्त केली आहे. या अपयशाची कारणमीमांसा शोधली जाईल असेही ते म्हणाले.
पुढे पाटील म्हणाले की ,” लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात चांगला कौल मिळाला. महाराष्ट्र विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे घटक म्हणून आमची जी भूमिका होती, ती मी व आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत चांगल्या पद्धतीने पार पाडली. मात्र, यश मिळाले नाही. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. तिने दिलेला कौल मान्यच करावा लागतो.
कुठे काय चुकले, याबाबत ज्या त्या पक्षांच्या स्तरावर विचारविनिमय होईल. इंदापूर तालुक्यात पक्ष पातळीवर बैठक घेतली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. केंद्र शासनाच्या सहकार्याने व आर्थिक मदतीने इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे सिंचन, उद्योग, रेल्वेचे दळणवळण हे प्रश्न केंद्राकडून सोडवून घ्यावे लागतील.उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी दिली जावी.
मच्छीमारी, दुग्ध व्यवसाय, मुद्रा योजना, प्रक्रिया उद्योग अशा केंद्राच्या विविध योजना आणि केंद्र शासनाच्या योजना आणण्यासाठी माझा पुढाकार राहील, अशी हमी पाटील यांनी दिली. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत शंभर दिवसांचा कार्यक्रम आखण्याची सूचना प्रशासनास दिली आहे. या कार्यक्रमात सहकार, अर्थ, वाणिज्य, कृषी व प्रक्रिया उद्योग या महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित असणाऱ्या साखर उद्योगाचा समावेश होण्याबाबत आपला प्रयत्न आहे.
कारण, साखर उद्योगाचा त्या कार्यक्रमात समावेश झाला तर त्याचा मोठा फायदा पुढच्या दहा वर्षांत या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या वर्गास होईल. धोरण तयार होईल. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहेच. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडे केंद्रीय सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद दिल्याचा फायदा होईल,असे पाटील यांनी सांगितले. दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर असलाच पाहिजे. पाच रुपयांचे अनुदानही मिळावे, अशी मागणी आपण दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.