चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी असताना या राज्यात अजून आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाज हा शैक्षणिक विकासापासून दूर राहिलेला आहे. आणि ज्या प्रमाणात आदिवासींचा विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही.
महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात आदिवासींचा शैक्षणिक विकास झालेला आहे कारण त्या ठिकाणी आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी विद्यापीठ घोषित करावे व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा बंद करून या विद्यापीठात समाविष्ठ करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे.या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ निर्माण केल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. नुकताच दहावी व बारावीचा निकाल लागला आहे. यामध्ये आदिवासींचा निकाल कमी लागला आहे. आदिवासी मुलामुलींसाठी इंग्लीश कॉन्व्हेंटची स्थापना या विद्यापीठांतर्गत करण्यात यावी, तरच या समाजाचा शैक्षणिक विकास होऊ शकेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठांची स्थापना झाली असून या विद्यापीठांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदिवासी विद्यापीठ स्थापन झाल्यास या समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी निवेदनाद्वारे केली व्यक्त केली आहे.