मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी नलिनी श्रीहरन जेलमधून बाहेर आली आहे. मद्रास हायकोर्टाने तिला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. नलिनीने आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी मद्रास हायकोर्टाकडे 6 महिन्यांच्या पॅरोलची मागणी केली होती. 21 जुलै 1991मध्ये तमिळनाडूनच्या श्रीपेरंबदूरमध्ये मानवी बॉम्ब धनुने राजीव गांधीची हत्या केली होती. या स्फोटात एकूण 18 लोकांचा मृत्यू झाला होता.
नलिनीची मुलगी लंडनमध्ये रहाते. 5 जुलै रोजी मद्रास हायकोर्टाने तिला 30 दिवसांचा पॅरोल दिला होता. नलिनीने चेन्नईमधील एका कॉलेजमधून ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले होते. ती चेन्नईमध्येच एका प्रायव्हेट कंपनीत स्टेनोग्राफरची नोकरी करत होती. सोबतच ती डिस्टंस एज्युकेशनद्वारे मास्टर्सचा कोर्सही करत होती.
काय होती राजीव गांधी हत्याकांडातील भूमिका ?
सुनावणीदरम्यान तिने असं मानलं होतं की, ती एलटीटीईच्या एका अॅक्टीविस्टच्या संपर्कात आहे आणि या दरम्यान तिची एलटीटीईच्या हालचालींशी ओळख झाली. यानंतर ती या संघटनेची अॅक्टीव कॅडर बनली. तिचा भाऊ पीएस भाग्यनाथनही अॅक्टीव एलटीटीई समर्थक होता आणि त्याच्या प्रेसमध्ये तमिळ ईलम साहित्य छापलं जात होतं.
का माफ झाली होती फाशी ?
अटक झाल्याच्या काही महिन्यांनंतर नलिनीने एका मुलीला जन्म दिला. जस्टिस थॉमसने नलिनीच्या फाशीला माफ करण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण तिची लहान मुलगी असल्याचे सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर मुरुगन आणि नलिनी यांना फाशी झाली तर ही मुलगी अनाथ होईल. यानंतर सोनिया गांधी यांनी स्वत: राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नलिनीला माफ करण्याचे आवाहन केले. यानंतर 2000 मध्ये राष्ट्रपतींनी नलिनीच्या दया याचिकेला मंजुरी देत तिला माफ केले.
सर्व कैदी तमिळनाडूच्या जेलमध्ये कैद
या प्रकरणी ताब्यात घेतलेले सर्व आरोपी आजही तमिळनाडूच्या जेलमध्ये कैद आहेत. वारंवार राजीव गांधींच्या खुन्यांना सोडण्याची मागणीही केली जाताना दिसते. राजीव गांधी यांच्या खुन्यांना सोनिया गांधी सहित गांधी-नेहरू कुटुंबांनीही माफ केले आहे.