पुणे बहुजननामा ऑनलाईन – शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक अजबच फतवा काढला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजकिय भूमिका घेऊ नये तसेच शासनविरोधी कृत्ये करू नयेत. असं या फतव्यात म्हटले आहे. तसं हमीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून वेळोवेळी असे अजब फतवे काढले जातात. सध्या विद्यापीठाची व महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अशातच विद्यापीठाकडून वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्यांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या निवयमावलीमध्ये हा फतवा काढण्यात आला आहे.
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणतीही राजकिय भूमिका घेता कामा नये. तसेच त्यांनी शासनविरोधी व राष्ट्रविरोधी कृत्ये करता कामा नये असं स्पष्ट करण्यात आले आहे. तर राष्ट्रविरोधी, समाज, जातीविरोधी आणि राजकिय उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होता कामा नये. असं या नियमावलीत म्हटलं आहे. त्यासोबतच हे मान्य असेल तर विद्यार्थ्यांनी हमीपत्र द्यावं. ते दिल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी या हमीपत्रातील नियमांचं उल्लंघन केल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी या सर्व नियमावलीला विरोध केला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर कसे मांडायचे. राष्ट्रविरोधी, शासनविरोधी कृत्ये म्हणजे काय याचाही उलगड़ा करण्यात यावा. तसेच प्रशासनाकडून काही अन्याय झाल्यास त्याविरोधात बोलल्यास त्याला सरकारविरोधी ठरविणार का ? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत.