नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन हे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक होते, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.नितीन दारमोड यांनी केले. कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी हे होते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.नितीन दारमोड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत अनेक मुस्लिम सैनिकांनी महत्वपूर्ण योगदान दिले. महाराजांच्या अंगरक्षकामध्ये अनेक मुस्लिम अंगरक्षक होते.
स्वराज्यासाठी लढणाऱ्या हिंदू सैनिकांसाठी ज्याप्रमाणे त्यांनी जगदीश्वराचे मंदिर बांधले. त्याचप्रमाणे मुस्लिम सैनिकांना नमाज पढण्यासाठी मशिद असावी म्हणून आपल्या महालाची जागा दिली. तर समाजातील काही लोकांनी हा खरा इतिहास आपल्यासमोर येऊच दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे चरित्र चिकित्सकपणे अभ्यासले पाहिजे व त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. शिवरायांचा खरा इतिहास हा हिंदु-मुस्लिम ऐक्याचा इतिहास असल्याचे आपल्याला दिसून येते. मोहम्मद दानिश यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.मारोती भोसले यांनी आभार मानले. यावेळी संदीप जांभरुनकर, मो.अन्वरोद्दीन, प्रा. खान नदीम परवेज, प्रा. अविनाश कोलते, प्रा.मो.रिजवान अब्दुल सुभान, प्रा. इमरान, प्रा. मुकरम, प्रा. नजीर, प्रा. नुरी बेगम, मो. फराज, लमतूर नूर व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.