पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आता ठीक झाला असून, आता एमपीएसीची २१ मार्च रोजी परीक्षा होणार आहे. मात्र या मुद्द्यावरून सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा असा या सरकारचा कारभार सुरू आहे. असा आणखी एकदा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तर नियुक्त्या रखडलेल्या ४२० उत्तीर्ण उमेदवारांचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच पडळकर म्हणाले, २१ तारखेला जर परीक्षा झाली नाही, तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेन, तसेच, करोना काळात परीक्षा न झाल्यामुळे परीक्षार्थींसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.
दरम्यान, पुण्यात गुरुवारी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप केला आहे. तर या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळतंय. माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का? पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला, असं पडळकरानी म्हटलं आहे. तसेच २०१९ला हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. या सरकारच्या समान किमान कार्यक्रमापैकी विश्वासघात हा एक प्रोग्रॅम आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पडळकर यांनी विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून देखील जोरदार टीका करत, सरकारमधले मंत्रीच म्हणत आहेत की परीक्षा पुढे ढकलायला नको. एक मंत्री म्हणतात माझ्या परवानगीशवाय निर्णय घेतला. सरकारनं काल सांगितलं कर्मचाऱ्यांच्या टेस्ट आणि इतर तयारी व्हायची आहे. याचा अर्थ हे सरकार गाफील होतं”. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तर सात दिवसांमध्ये जी मुलं सेंटरजवळ येऊन थांबली आहेत, त्यांना ७ दिवसांचा प्रत्येकी २० हजार रुपये भत्ता द्या. या मुलांची भाडे भरायची परिस्थिती नाही, त्यांचे खायचे वांदे आहेत. असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.