पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे वाचले होते, पण गेल्या तीन वर्षात याचा प्रत्यक्ष अनुभव आला. पुण्याची भौगोलिक रचना, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कामात प्रचंड विविधता असल्याने या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा ठरला. पुण्यात चांगल्या कामाचे कौतुक केले जाते आणि चुकला तर तेवढीच टीकाही होते, असे मत प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झालेले नवल किशोर राम यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
पुण्यामध्ये बुद्धीजीवी लोक राहतात. पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुका, पुर परिस्थिती, भीमा कोरेगावचा हाताळलेला प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील दखल घेतली आणि आताचे कोरोना संकट. या सर्व कामांचा अनुभव अधिक समृद्ध करणारा असल्याचे राम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन राबवण्याचे आवाहन केले.
अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालीका आयुक्त श्रावण हार्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पुण्याची जाण असलेले अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही आनंदाची बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.