मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अलीकडील काळात रिचार्ज प्लॅन सतत बदलत असून आता मुकेश अंबानी यांनी नुकतेच भारतात 5 जी लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी चीनची मदत न घेता 5 जी लाँच करणार असल्याचे म्हटले आहे. यात महत्वाची बाब म्हणजे ही घोषणा करताना तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही उपस्थित होते. त्यांनी अंबानींचे अभिनंदन केले. जिओ आता त्यांनी तयार केलेल्या 5 जी नेटवर्कची ट्रायल घेणार आहेत.
ज्यावेळी जिओने 4 जी आणले तेव्हा धमाका उडवून दिला होता. पहिले काही दिवस मोफत आणि नंतर थोड्या पैशात जो डेटा महिन्याला ५०० रु. मिळत नव्हता तो आता दिवसाला मिळत आहे. यामुळेच अनके लोकं लगेच जिओकडे वळल्यामुळे याअगोदर होणारी लूटमार थांबली. पण नंतर जिओचे नेटवर्क स्लो झाले. सध्या जगभरात 5 जीचे वातावरण असून 4 जीपेक्षा जास्त वेगवान असणारे 5 जी नेटवर्क सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिओचे हे तंत्रज्ञान चीनची थोडीही मदत न घेता विकसित केले असून 5 जीची चाचणी घेण्यासाठी जिओने सरकारकडे परवानगी मागितली आहे. जर 5 जीची चाचणी यशस्वी झाली तरच 5 जी उपकरणांची निर्मिती इतर कंपन्यांकडे देण्यात येईल, अशी शक्यता आहे. सॅमसंग, हुवावे, नोकिया आणि एरिक्सन सारख्या कंपन्या त्यासाठी मदत करतील, अशी शक्यता आहे. सध्या जिओची 4जी उपकरणे सॅमसंग बनवत असून 5जी देखील सॅमसंगच्या वाट्याला जातील, असे वाटत आहे.
मागच्या महिन्यात मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भारतातील कोणताही छोटा उद्योजक पुढील काळात धीरुभाई अंबानी बनू शकतो, असे अंबानी यांनी सांगितले. जिओमुळे भारतातील इंटरनेट अत्यंत स्वस्त झाले असून याअगोदर १जीबी डेटा ३०० ते ५०० रु. असताना तो आता १२ ते १५ रु. झाला आहे, असेही अंबानी म्हणाले होते.
सध्या देशातील प्रमुख वोडाफोन आणि एअरटेल या कंपन्या तोट्यात असून 5 जी स्पेक्ट्रम घेण्यासाठी या कंपन्या तयार नाहीत. अशात जर जिओने 5 जी नेटवर्क आणले तर त्यांना नुकसान होईल. कारण बीएसएनएलकडे सध्या 4 जी देखील उपलब्ध नाहीये.