बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून फक्त विशेष मार्गांवर धावणारी रेल्वे आता सर्व मार्गांवर धावणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 एप्रिलपासून सर्व प्रवासी रेल्वे धावणार आहेत. त्यामध्ये जनरल, शताब्दी आणि राजधानी या रेल्वेंसह इतरही अनेक रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे या रेल्वेसेवांना PMO कडून लवकरच हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. तसेच सध्या रेल्वेकडून 65 टक्के प्रवासी रेल्वेगाड्या धावत आहेत. यामध्ये मेल आणि एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तर उर्वरित 35 टक्के रेल्वेगाड्या बंद आहेत. पण रेल्वेकडून घेतल्या जाणाऱ्या या निर्णयाचा फायदा लाखो रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
सर्व रेग्युलर रेल्वेगाड्या होत्या बंद
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊनदरम्यान सर्व रेग्युलर पॅसेंजर रेल्वेसेवा थांबविण्यात आल्या होत्या. त्यावेळी फक्त कोव्हिड स्पेशल रेल्वेगाड्याच धावत होत्या.
कमी द्यावे लागेल प्रवासाचे भाडे
सध्या कोरोना स्पेशल ट्रेन धावत आहेत. त्याचे प्रवासाचे भाडे जास्त आहे. जर सर्वकाही ठिक झालं तर एक्स्प्रेस, मेमू, डेमू आणि इतर लोकल रेल्वेगाड्या लवकरच सुरु केल्या जाऊ शकतात. तसेच सणासुदीला घरी, आपल्या गावी जाण्यासाठी लोकांना रेल्वेगाड्या उपलब्ध असतील आणि रेल्वेगाड्या पूर्ववत झाल्यास रेल्वे प्रवासाचे तिकीटही कमी होईल.