नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचाऱ्यांच्या ठेवीवर ईडीएलआय ( Employees’ Deposit Linked Insurance-EDLI) आता 7 लाखांपर्यंत वाढविला असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. ईडीएलआय योजन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या सर्व ग्राहकांना जीवन विम्यात योगदान देण्यासाठी असते. ईडीएलआय विमाधारकाच्या नियुक्त केलेल्या लाभार्थीस नैसर्गिक कारणाने, आजारपण किंवा अपघात यामुळे मृत्यू झाल्यास एकरकमी रक्कम देण्याची तरतूद करते.
ईडीएलआय योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यास उत्पन्नाचे संरक्षण देणे हा आहे. हा फायदा कंपनी आणि केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. ही योजना ईपीएफ आणि ईपीएस यांच्या संयोजनात काम करते. याअंतर्गत, ग्राहकांनी लाभ मिळविण्यास पात्र होण्यापूर्वी सलग 12 महिने काम करणे आवश्यक नाही. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीने वर्षात एक महिन्याचे अंतर घेतले असेल तर तो त्यास त्याचा फायदा मिळू शकतो.
विम्यासाठी दावा कसा करावा?
जर ईपीएफ ग्राहक अकाली मरण पावला तर त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा संरक्षणासाठी दावा करु शकतात. हक्क सांगणारा हा अल्पवयीन असेल तर त्याचा पालक त्याच्या वतीने दावा करु शकतो. यासाठी विमा कंपनीला मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र आणि बँकेचा तपशील देणे आवश्यक आहे.
जर पीएफ खात्याचे नामनिर्देशित नसेल तर कायदेशीर वारस या रकमेवर दावा करु शकतात. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी, नियोक्ताकडे( employer) जमा करण्याच्या फॉर्मसह विमा संरक्षणाचे फॉर्म सबमिट करावे लागते. नियोक्ता हा फॉर्म सत्यापित करतो. यानंतर तुम्हाला कव्हरचे पैसे मिळतात.