मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढवली आहे. मात्र, चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यास किमान चार ते पाच दिवस लागत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना दिले आहेत.
ठाकरे यांनी ऑनलाइन बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ठाकरे म्हणाले, सध्या बाधितांसाठी पुरेशी व्यवस्था आहे, तरी देखील अतिरिक्त बेडच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा असेही त्यांनी सांगितले.
इक्बाल सिंह चहल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी मध्ये आली. असली तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणे नसलेले बाधित रुग्ण आहेत. तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत.
आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी करण्यासाठी, कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने अँटिजन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले, तर त्यांचे विलगीकरण करून, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरून बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील. अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी मुख्य सचिव कुंटे यांनी येत्या काळात अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
दोन लाख रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करणार सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. त्याचबरोबर रेमडेसिविर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही, याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सांगून चहल म्हणाले की, रेमडेसिविर इंजेक्शनच्या दोन लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश दिले असून २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत.