मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे. मुंबई – नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला नाव देण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. अशातच कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. फडणवीस सरकारचा एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पहिले जात आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2649898355100813&id=559874610769875
ठाकरे सरकारने या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे. या पत्रात गणपत गायकवाड यांनी म्हंटले आहे की, भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग मुख्य मानबिंदू ठरणारा आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तसेच मुंबई दादर येथील चैत्यभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. हे चैत्यस्मारक बहुजन समाज आणि बौद्ध अनुयायांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
या धार्मिक स्थळाला राज्यातून, देशातून हजारो लोक भेट देत असतात. त्यामुळे १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. या द्रुतगती मार्गाच्या नामकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे. या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत नवीन सरकारने मुंबई ते नागपूर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याची केवळ घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Visit : bahujannama.com