बहुजननामा ऑनलाईन – राज्यात सहायक प्राध्यापक भरतीला राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नसल्यानं याविरोधात नेट सेट पात्रताधारकांनी अनोखं आंदोलन केलं. नेटसेटधारकांची वर्षा बंगल्यावर धुणी, भांडी कर्मचारी किंवा स्वयंपाकी म्हणून नियुक्ती करा, अशा मागणीचे शेकडो ई-मेल (E-Mail) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवून त्वरित भरतीचा निर्णय घ्या, अशी मागणी केली आहे.
‘सरकारनं प्राध्यापक भरतीचा निर्णय घ्यावा यासाठी वारंवार शासनाला निवेदन’
नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीतर्फे रविवारी ही मोहीम राबवण्यात आली. राज्यातील नेट, सेट पात्र झालेले तरुण महाविद्यालयांमध्ये तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. लॉकडाउनमुळं तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी संघर्ष समितीतर्फे वारंवार शासनाला निवेदन देण्यात आलं आहे.
E-Mail मध्ये नेमकं काय?
उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमात मंत्री उदय सामंत यांना प्रत्येक विद्यापीठात निवेदन दिलं आहे. मात्र, प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्याची मानसिकता नाही. त्यामुळं आज संघर्ष समितीतर्फे ई-मेल मोहीम राबवण्यात आली. यात जर सरकारला प्राध्यापक भरती करता येत नसेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला त्यांच्या घरी धुणी, भांडी, वॉचमन काम, स्वयंपाकी म्हणून काम द्या, बागकाम करण्यासाठी नोकरी द्या, अशा मागण्यांचे ई-मेल पाठवण्यात आले.
संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवढे पाटील म्हणाले…
संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवढे पाटील म्हणाले, प्राध्यापक भरती होत नसल्यानं बेरोजगार तरुणांची काय स्थिती आहे, हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देण्यासाठी ई-मेलची मोहीम राबवण्यात आली. राज्यभरातून नेट, सेट पात्रताधारक, पीएचडीधारकांनी मोठ्या प्रमाणात ई-मेल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरातील काम करण्यासाठी नियुक्ती करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.