पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवांकीत करावे, अशी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या शेकडो विचार समर्थकांनी क्रांतीज्योत आंदोलनाद्वारे केली. 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ अण्णाभाऊंच्या जन्मगावी वाटेगाव येथे झाला. तेथून कराड-सातारा-खंडाळा-शिरवळ आणि पुणे यामार्गे क्रांतीज्योतीचे सारसबाग येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने झोपडपट्टी सुरक्षा दल, दलीत विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दलातर्फे या क्रांतीज्योत आंदोलनाचे आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाखील करण्यात आले होते.
क्रांतीज्योतीचे सारसबाग येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली क्रांतीज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य महामोर्चा द्वारे नेण्यात आली. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने अण्णाभाऊ साठेंना गौरवांकीत करण्याच्या मागणीचे निवेदन भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून बहुजन समाजाची वेदना मांडली. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा झेंडा उंचावला त्यांना सरकारी दरबारी त्यांच्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय दुर करुन त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहे.