जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यावर “सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे” अखिल भारतीय बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री रामदास बोडके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी, नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे, बारी समाजाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अनुप बारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.
बारी समाज देशभरात बरई, तांबोळी, चौरसिया, कुमरावत अशा पोटजातींमध्ये विखुरला आहे. समाज जरी मोठा असला तरी अजून देखील समाज एकत्र झालेला नाही. त्यामुळे समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच पोटजातींमध्ये ‘रोटी-बेटी’ व्यवहार देखील व्हावा यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिवेशनाचे कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी केले.