चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – येथील सैनिकी शाळेची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, एससी, एसटी, इतर राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी तसेच आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ५२ टक्के ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा राखीव नाही. त्यामुळे ओबीसी समाजात कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रात ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के तर राज्यात १९ टक्के आरक्षण असतानासुद्धा ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय करण्यात येत आहे. आता हा अन्याय ओबीसी समाज खपवून घेणार नसल्याची भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे. दरम्यान, सैनिकी शाळेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचा इशारा समाजबांधवांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
देशाच्या विकासात ओबीसी समाजाचा फार मोठा वाटा आहे. परंतु, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरसुद्धा सतत ओबीसींवर अन्याय करण्यात येत आहे. त्या अन्यायाविरोधात केव्हा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. ५२ टक्के ओबीसी विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या सैनिकी शाळेमध्ये २७ टक्के आरक्षण देण्यात आले नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ओबीसी संघटना घेतील, असे ओबीसींचे नेते डी.के. आरीकर यांनी राष्ट्रपतींना निवेदनातून दिला असून, ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाविरोधात जिल्हाभर तिव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल, असा इशाराही डी.के. आरीकर यांनी निवेदातून दिला आहे. त्याचप्रमाणे ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण न देता घटनाबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डी. के. आरीकर, सुनील दहेगावकर, महेंद्र मेश्राम, डॉ. देव कन्नाके, डॉ. बाळकृष्ण भगत, छाया दुधलकर, संध्या चंदनखेडे, शुभांगी डोंगरवार, गणेश गिरीधर, अविनाश मोरे, आदींची उपस्थिती होती.